भारताने “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत ७ मे २०२५ रोजी मध्यरात्री १:०५ वाजता पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा सूड घेत, अवघ्या २३ मिनिटांत हे ऑपरेशन यशस्वी केले. या कारवाईने पाकिस्तान हादरले असतानाच, ८ मे रोजी सकाळी लाहोरमधील वाल्टन विमानतळ, गोपाल नगर आणि नसराबाद परिसरात तीन मोठे स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले. प्रत्यक्षदर्शींनुसार, सलग तीन बॉम्बस्फोटांचे आवाज ऐकू आले, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली. बचाव आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. स्फोटांचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पाकिस्तानातील हालचालींना वेग
भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने ताबा रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर सैन्य तैनाती वाढवली आहे. युद्धसामग्री आणि रणगाडे जमवण्यास सुरुवात झाली आहे. लाहोरमध्ये ‘नोटीस टू एअर मिशन’ जारी करून सर्व विमाने रद्द करण्यात आली आहेत. सीमावर्ती गावेही रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानी सैन्य आणि प्रशासनाकडून तातडीच्या हालचाली सुरू आहेत.
लष्कर-ए-तोयबाच्या अंत्ययात्रेने खळबळ
पाकिस्तानच्या मुरीदके फुटबॉल स्टेडियममध्ये ७ मे रोजी लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत पाकिस्तानी सैन्य आणि पोलिसांनी सुरक्षा पुरवली. या अंत्यसंस्कारांना लष्कराचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे, शवपेट्यांपुंढे नमाज पढणारा कोणी धर्मगुरू नव्हता, तर तो होता कुख्यात दहशतवादी हाफिज अब्दुल रौफ. लष्कराचे अधिकारी या दहशतवाद्याच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभे असल्याने जागतिक समुदायाचे लक्ष वेधले गेले आहे.
