
ताम्हिणी घाटातील हृदयद्रावक अपघात: सहा तरुणांचे अमूल्य जीव गेले
पुणे-कोकण मार्गावरील ताम्हिणी घाट हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला असला, तरी त्याच्या वळणदार रस्त्यांमुळे नेहमीच धोकादायक मानला जातो. नुकताच याच घाटात झालेल्या भीषण अपघाताने सहा तरुणांचे प्राण हरपले. हे सर्व तरुण वयाच्या विशीच्या आत-बाहेरचे होते. नुकतेच तारुण्यात पदार्पण केलेले, स्वप्नांचे रंग भरू पाहणारे, कुटुंबाला आधार व्हावे अशी आशा असलेले हे होतकरू तरुण एका क्षणात काळाच्या ओढ्यात गेले. हा अपघात केवळ त्या सहा कुटुंबांवरचा आघात नाही, तर संपूर्ण समाजाची आणि राष्ट्राची मोठी हानी आहे.
कारण तरुण पिढी ही राष्ट्राची खरी संपत्ती असते. देशाच्या प्रगतीत, अर्थव्यवस्थेत, संशोधनात, क्रीडेत, कलाक्षेत्रात, उद्योग-व्यवसायात सर्वत्र तरुणांचाच हातभार लागतो. या वयात माणूस सर्वाधिक ऊर्जावान, स्वप्नाळू आणि धाडसी असतो. पण त्याच धाडसाचा अतिरेक अनेकदा जीवावर बेततो. ताम्हिणी घाटासारख्या अपघातप्रवण भागात अशा घटना नव्या नाहीत, पण प्रत्येक वेळी त्या समाजाला प्रश्न विचारायला भाग पाडतात – आपण आपल्या तरुणांना कितपत सुरक्षित ठेवतो आहोत? आणि सर्वांत महत्त्वाचे – तरुण स्वतः कितपत सावध आहेत?

अशा अपघातांमागची नेमकी कारणे काय?
१. वेगाचे आकर्षण आणि थ्रिल – तरुण वयात वेगाची नशा चढते. घाटातील वळणे, वाऱ्याचा झोत, मित्रमंडळींची टिंगल-टवाळी यात गाडीचा वेग वाढत जातो. “थोडा रिस्क घेऊया” असे वाटते आणि मग नियंत्रण सुटते.
२. संयम सुटणे – घाटरस्त्यावर संयम हा जीव वाचवणारा सर्वांत मोठा घटक असतो. पण संगीत, गप्पाटप्पा, सेल्फी काढणे, रील बनवणे या गोष्टींमुळे ड्रायव्हरचे लक्ष रस्त्यावरून हटते.
३. मद्यपान करून वाहन चालवणे – पार्टी आटोपल्यानंतर “अरे चल ना, मी ठीक आहे” असे म्हणत गाडी हातात घेणे, हे अनेक अपघातांचे मूळ कारण ठरले आहे.
४. ईर्षा किंवा दाखवाबाजीपोटी ओव्हरटेकिंग – समोरची गाडी मागे टाकण्याच्या नादात चुकीच्या बाजूने, वळणावर किंवा डोळे दिपवणाऱ्या वळणावर जोखीम घेतली जाते.
५. घाटातील खास धोक्यांकडे दुर्लक्ष – ताम्हिणी घाटात अनेक ठिकाणी रस्ता अरुंद आहे, खोल दरी आहे, ब्रेक फेल होण्याचा धोका असतो, पावसाळ्यात रस्ते निसरडे असतात. तरीही पुरेशी काळजी घेतली जात नाही.
पोलिस आणि प्रशासन तपास करेल, सीसीटीव्ही फुटेज तपासले जातील, ब्रेक फेल झाले की टायर फुटले की वेग जास्त होता याचा अहवाल येईल. पण झालेली हानी कधीच भरून निघणार नाही. सहा कुटुंबे उघडीपांघरूण झाली, सहा माता-पित्यांचे जग संपले, भावंडांचे आधार गेले.
तरुणांनो, थोडा विचार करा… तुमचा जीव फक्त तुमचाच नाही. त्यावर आई-बाबांचे स्वप्न अवलंबून आहे, भावंडांचे भविष्य अवलंबून आहे, मित्रांचे प्रेम अवलंबून आहे. अपंगत्व आले तर उर्वरित आयुष्य कसे जगणार? कायमस्वरूपी व्हीलचेअरवर अवलंबून राहायचे का? एक क्षणाचा थ्रिल आणि आयुष्यभराचा पश्चात्ताप – ही किंमत फारच जास्त नाही का?
काय करायला हवे? – घाटात प्रवास करताना वेग मर्यादा काटेकोरपणे पाळा (सामान्यतः ३०-४० किमी/तास). सीट बेल्ट, हेल्मेट सक्तीचे. मद्यपान केले असेल तर गाडी स्वतः चालवू नका, ड्रायव्हर नेमा किंवा दुसऱ्या दिवशी प्रवास करा. मित्रांनी एकमेकांना आवर्जून सांगा – “अरे हळू चालव ना”. रात्रीच्या वेळी घाट कट करणे टाळा. गाडीची नियमित सर्व्हिसिंग, ब्रेक-टायरांची तपासणी करा
शेवटी एकच सांगावेसे वाटते –
“वेगाचं आकर्षण आणि मृत्यूला निमंत्रण”
हा अपघात आपल्याला हादरवून गेला आहे. पण उद्या आपणही विसरू आणि पुन्हा तेच चक्र सुरू होईल, असे होऊ देऊ नका. प्रत्येक तरुणाने हे वाक्य मनात कोरून ठेवावे. कारण जीवन अमूल्य आहे. ते एकदाच मिळते आणि तेही परत मिळत नाही. ताम्हिणी घाटात गेलेल्या सहा होतकरू जीवांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचे कुटुंबीयांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो. आणि आपण सर्वजण शहाणे होऊया… सावध राहूया… कारण प्रत्येक जीव मौल्यवान आहे.
इमेज – सौजन्य ABP Maza











