मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या दोन दिवसांत सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई करत सुमारे ८ कोटी ६० लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई बँकॉकहून आलेल्या दोन वेगवेगळ्या प्रवाशांवर संशय आल्याने करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, बँकॉकहून दोन वेगवेगळ्या फ्लाइटने मुंबईत दाखल झालेल्या प्रवाशांकडून सुमारे साडेआठ किलो गांजा त्यांच्या सामानामध्ये लपवून आणल्याचं उघड झालं. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांच्या बॅगची कसून तपासणी केली असता, गांजाची ही मोठी मात्रा आढळून आली.
या प्रकरणी तीन भारतीय नागरिकांना अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली (NDPS Act) अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची बाजारमूल्य सुमारे ८.६० कोटी रुपये इतकी असल्याचं अधिकार्यांनी सांगितलं.
सीमाशुल्क विभाग आणि इतर संबंधित यंत्रणा या प्रकरणाचा उगम शोधत असून, हे एक आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई विमानतळावर सुरक्षेचे कडक उपाय असूनही अशा प्रकारे गांजाची तस्करी करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे सुरक्षाव्यवस्थेच्या दृष्टीनेही याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
